पुणे : आपण प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावला, तर देशात एक सक्षम सरकार येऊ शकते. यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. हा संदेश देण्यासाठी पुणे शहरातील जबाबदार नागरिकांनी एकत्र येत ‘व्होट फॉर स्ट्राँग गव्हर्न्मेंट’ अभियान सुरू केले आहे.
नागरिकांशी संवाद साधून मतदान जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी या अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे, विलास रबडे, मिलिंद भागवत, अभय भंडारी, नचिकेत भंडारी, रवींद्र खाडिलकर आदींनी पत्रकार परिषद घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले.
या वेळी यशवंत घारपुरे म्हणाले, ‘शिपायाची नोकरी करण्यासाठीही दहावी-बारावी शिक्षण असावे लागते. मात्र, राज्याची धुरा सांभाळणाऱ्या राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही. लोकशाहीच्या नावाखाली निरक्षर लोकांना निवडून द्यावे का हा विचार केला पाहिजे. राजकारण किंवा सगळेच राजकारणी वाईट नाहीत. त्यात अनेक चांगले आणि धडपडीने काम करणारे आहेत. तेव्हा चांगल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित राजकारण्याला निवडून देण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारी राजकारण्यांना दूर ठेवायचे असेल, तर आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करणे सोडल्यामुळे आणि निवडणुकीची सुट्टी फिरायला जाण्यात घालवणे यामुळे आजची राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. त्याचाच फायदा घेऊन मूठभर राजकारण्यांनी राजकारण बदनाम केले शिवाय देशाच्या प्रगतीत खोडा घातला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्याला समस्या सोडवाव्यात, आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, असे वाटत असले, तर आपण प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. तेव्हा जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. मनाशी पक्के करा की यंदा मतदानाचा हक्क बजावणारच. उमेदवार निवडताना त्याचे शिक्षण, त्याची सामाजिक जाणीव, निष्ठा, प्रामाणिकपणा तपासून बघा. तुमचे मत अमूल्य आहे. ते देताना नीट विचार करून द्या. चांगला आणि सुयोग्य उमेदवार निवडा’.
विलास रबडे म्हणाले, ‘योग्य व्यक्तीला मतदान करा व चांगल्या सरकारची अपेक्षा करा. आम्ही जनतेने शंभर टक्के मतदान करावे म्हणून एक लाख बिल्ले तयार केले आहेत. या बिल्यावर ‘Vote for strong government and protect Nation’, ‘योग्य उमेदवाराला चांगले सरकार बनविण्यासाठी मतदान करा व देश अपात्र व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या उमेदवारापासून वाचवा’ असा संदेश छापला आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सभासद नाही. फक्त चांगले सरकार निवडून येण्यासाठी लोकांनी मतदान करावे यासाठी प्रयत्न करत आहोत. भेटेल त्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात असून, खेड्यामध्ये जाऊनही याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सध्या एकूण २० ग्रुप वेगवेगळ्या भागात काम करत आहेत’.
या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क : ९८२२५ ०२०७८, ९८२०० २६२६५